संत नरहरी सोनार महाराज

संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.

संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा असून मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती. त्यांचे वडील श्री. अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते. त्यांना नाईक, पोतदार, सोनार अशा उपाध्या प्राप्त होत्या म्हणून महामुनी ऐवजी सोनार नावाने ओळखले जात होते.

महाराजांच्या शिवभक्ती विषयी –

नरहरी सोनार पोतदार पंढरीचा काया वाचा मने शिवभक्त

आडनाव महामुनी मुळ मेहत्रे वतन मिरासी दुकान महाद्वारी ।।

संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. त्यांच्या घरात परंपरेने शिवभक्ती चालत आलेली होती, त्यामुळे ते शिवभक्त होते. रोज सकाळी उठल्यावर नित्यनेमाने जोतिर्लिंगावर बेलपत्र वाहून ते शिवाची आराधना करीत असत. अशा रितीने त्यांची शिवभक्तीही दिसून येत होती.

एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली, पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले, यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात जाऊन डोळ्यांवर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. ते जेव्हा सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यांवरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, ‘पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू हे भिन्न नसून एकच आहेत.’ हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले,

देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार ।। 

त्याकाळी नरहरींच्या समाधीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता. साक्षात मायबाप विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासहीत संत ज्ञानदेव, संत निवृत्ती, संत चोखामेळा, संत नामदेव ही संत मंडळी उपस्थित होती. आजही संपूर्ण भारतभर व विदेशात सर्व संप्रदायात माघ कृष्ण तृतीयेला संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तर माघ कृष्ण तृतीयेला पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो.

Share